Friday, 8 November 2019

पुर्व शिरूरचे कोर्ट :स्व.माधवराव अण्णा फराटे इनामदार


मला लहान असताना जेवणाचा लै कंटाळा यायचा (आताही आहे)त्यामुळं मला जेवण भरवण्यासाठी माझे आजी बाबा मला गोष्टी सांगुन मला घास भरवायचे.मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी आमच्या बाबांना सांगायला फार आवडत मी पण मोठ्या कुतुहुलाने त्या ऐकायचो त्यामुळं मला तोडक्या मोडक्या का होईना त्या लक्षात राहिल्यात.असच एकदा मी आमचे बाबा कै.बापुराव देशमुख यांच्या बरोबर गप्पा मारत बसलो होतो.त्यांनी मला एक धाडसी किस्सा सांगितला तो किस्सा होता पुर्व शिरूरचे कोर्ट :स्व.माधवराव (अण्णा) फराटे यांच्या बद्दलचा.स्व.माधवराव अण्णा म्हणजे शिरूर तालुक्याच्या तत्कालीन राजकारणातील एक मोठं प्रस्थ. मांडवगण फराटा या गावातील इनामदार कुटुंबातील कारभारी व्यक्तिमत्व.मांडवगण हे त्या काळातील शिरूर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मोजक्या गावांपैकी भीमथडीच्या तटावरच  एक मोठं गाव. तो सालस ,सुसंस्कृत,प्रेमळ आणि मायाळु असल्याचा  लौकिक  मांडवगणकरांनी आजही जपुन ठेवलाय.शिरूर तालुक्याच्या पुर्व पट्ट्यातील भांडणतंटे घोडनदीच्या कोर्टात येत नसत त्याचं एकमेव कारण म्हणजे स्व. माधवराव अण्णा. त्यांना मोलाची साथ होती ती श्री.एन्.डी.दादा फराटे यांची.त्यांच्या साहसाचा अनुभव मात्र मला माझ्या बाबांनी सांगितलेल्या अनुभवातून आला.
   
एकदा स्व.माधवराव अण्णा कामानिमित्त पुण्याला का मुंबईला गेले होते.या घटनेचा काळ मला माहीत नाही.एस.टी.स्टँड वर उतरल्यानंतर त्यांनी पुढचा इच्छित स्थळी जाण्याचा प्रवास रिक्षाने करण्याचा ठरवलं.स्व.माधवराव अण्णांच डोळ्यात भरणारं व्यक्तिनत्व रिक्षावाल्यानी हेरलं होत.प्रथमदर्शी पाहता कुणीही स्व.माधवराव अण्णांची पारख करू शकत होतं.तरी पण रिक्षा चालवणाऱ्याने  फसवुन स्व.माधवराव अण्णांना एका अंधाऱ्या बोळीत नेलं तिथ गेल्यावर आणखी ४-५ जणांनी  अण्णांना घेरलं आणि चाकुचा धाक दाखवुन पैशांची मागणी केली.स्व.अण्णांनी परिस्थीती ओळखुन लगेचच आपल्या कोपरीच्या आतल्या खिशातुन पिस्तुल बाहेर काढला.पिस्तुलाकडे पाहताच त्या भुरट्या चोरांची पळताभुई थोडी झाली.त्या चोरांनी अण्णांची माफी मागुन अण्णांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवलं.आता जरी मांडवगणच्या ऊसात बिबटे सापडत असले तरी पुर्वी या मातीनी वाघांना घडवलय हे नक्की!!
तर असा होता आमच्या बाबांनी मला सांगितलेला किस्सा .हा किस्सा ऐकताना मी अगदी तल्लीन होऊन ऐकत होतो. बाबा एखाद्या वेळी थांबले की मी म्हणायचो "मंग ओ बाबा पुढं काय झालं?"
अशा साहसाच्या गोष्टी माझ्या वीररसात्मक साहित्या पेक्षा कमी नाहीत

#हर्षवाणी
#दादारावचानातु
#मोठीमाणसंमोठ्यागोष्टी

✍सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

छायाचित्र :Balasaheb Pharate यांजकडुन

Tuesday, 5 November 2019

कार्यसम्राट सरपंच

 

सन १९६२ साली वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था अस्तित्वात आली .त्याचा मुख्य हेतु होता सत्तेचे विकेंद्रीकरण.त्याला अपयश आले असे म्हणता येणार नाही,विविधांगी स्वरूपातुन महाराष्ट्राच नेतृत्व याच पायऱ्या चढुन आल्याच आपल्याला दिसतं.ग्रामीण नेत्यांनी  शहरी लोकांना देखील भुरळ पाडली .यात ग्रामपंचायत आणि त्या माध्यमातुन होणारा  विकास देखील महत्वपुर्ण ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तर सरपंच आणि त्याच्या अधिकारात अमुलाग्र बदल झाले.पंचायत समितीचा निधी कमी करून  तो निधी थेट ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे

शिक्षणाने व आधुनिकतेने प्रेरित झालेले तरूण यात सहभागी होताना दिसतात ही फार मोठी समाधानाची बाब आहे.त्याचाच प्रत्यय मला आमच्या नळावणे गावात आला जुन्नर तालुक्यातील ईशान्य भागात वसलेले नळवणे म्हणजे निजामशाही काळापासुन जुन्नर प्रांताचे देशमुख असलेले हांडे देशमुखांच मुळ गाव .नळवणे गाव हे नळवणे पठार म्हणुन जुन्नर तालुक्यात फार प्रसिद्ध आहे .कुलस्वामी श्री मार्तंड भैरवाचा वास त्या नळवणे गावाला लाभलेला आहे.जुन्नर तालुक्यात ५ धरणांचा कुकडी प्रकल्प असुनही नळावण्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता.तीर्थक्षेत्र असुनही गावाला जोडणारे रस्ते मात्र नाममात्र शिल्लक होते.पण २०१५ साली एक इंजिनीअर तरूण पुण्यातील मासिक ७०,००० पगाराची नोकरी सोडुन गावात येतो काय अन् गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गेली २५ वर्ष राजकारणात मातब्बर असणाऱ्या व्यक्तीला निवडणुकीच्या आखाड्यात चितपट करतो काय !!हा सगळा चमत्कार करतो काय !!हा चमत्कार करणाऱ्याच नाव आहे श्री.तुषार तान्हाजी देशमुख आजचा तिशीतला तरूण वयाच्या २७ व्या वर्षी गावचा सरपंच झाला अन् गावचा चेहरामोहरा बदलला.

तुषार दादा उच्चशिक्षित अन् वयाने तरूण असल्यामुळ तरूणांचा त्यांच्यावर फार लोभ असल्याचे मला जाणवलं. आपल्या मधुरवाणीचा उपयोग करून अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत भेटीचा मजल मारली व गावासाठी निधी उपलब्ध केला.गेल्या ४ वर्षात तब्बल ७ कोटींचा निधी त्यांनी उपलब्ध केलाय .आज गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्याला जोडणारा डांबरी रस्ता झालाय ,वाड्या वस्त्या देखील पक्क्या रस्त्यानी जोडल्या गेलेल्या आपल्याला दिसतात याचं श्रेय फक्त तुषार दादांना जातं.गावात पावसाळ्याचे ४ महिने सोडले की पाण्याची वाणवा भासायची ,दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायची.पण गावात उत्कृष्टरित्या पाणीपुरवठा योजना राबवत गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा तुषार दादांनी खाली उतरवला आणि मायमाऊलींच वात्सल्यरूपी प्रेम मिळवण्यात यश प्राप्त केल.

तुषार दादांच्या कार्याची दखल अनेक वर्तमान पत्रांनी देखील घेतली आहे.लोकमत वृत्तसमुहाचा आदर्श सरपंच पुरस्कार देखील तुषारदादांनी पटकवला आहे .त्यांच्याबरोबरच नळवणे गावच व संपुर्ण हांडे देशमुख परिवाराच नाव त्यांनी उज्वल केलं आहे.त्यांनी याच प्रकारे गावच व आपल्या घराण्याच नाव उज्वल कराव ही श्री मार्तंड चरणी प्रार्थना करतो.

आपलाच 
हर्षद रमेश हांडे देशमुख 
कसबे कर्डे ता.शिरूर जि.पुणे

माझे गुरू:दादासाहेब निंबाळकर



आज गुरूपौर्णिमा ,आपल्या चिखला सारख्या मनाला मडक्याचा आकार देऊन समृद्ध करणाऱ्या कुंभाराच्या पुजेचा दिवस. प्रत्येक जण आयुष्यात शालेय शिक्षका़व्यतिरिक्त कुणाचा तरी शिष्य असतोच ,किंबहुवा त्या शिवाय त्या व्यक्तीची मानसिक व सामाजिक जडणघडण होणे शक्य नसतं,अस माझ वैयक्तिक मत आहे.
              हाच विचार गृहित धरला तर माझे वयाने आणि कर्तृत्वाने सर्वांत ज्येष्ठ गुरू म्हणजे कै.मारूतराव निंबाळकर ,आमच्या आजोबांचे मामा ,लोक त्यांना आदराने दादासाहेबच म्हणत.गावची मुकादमी असणाऱ्या एका 'सत्यशोधक' घराण्याचा वारसा दादासाहेब सांगत होते .सत्यशोधक दत्तोबा पा.निंबाळकर हे दादासाहेंबाचे वडील,दादासाहेब त्यांचे थोरले अपत्य.सातवी पर्यंत शिक्षण घेऊन दादासाहेबा़ंनी शाळा सोडली .एक नाही तर तलाठी,शिक्षक,पोलीस यासारख्या सात नोकऱ्या सोडल्या कारण त्यांचा मुळचा पिंड राजकीय नेत्याचा होता.दादासाहेबांचे वडील  सत्यशोधक दत्तोबा पा.निंबाळकर हे देशभक्त केशवराव जेधे यांचे मित्र त्यामुळे जेध्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर दत्तोबा पाटलांनीही कॉंग्रेसची वाट धरली.आणि जेधे साहेबांनी दत्तोबा पाटलांकडे गळ घातली की "पाटील तुम्ही तुमच्या पोराला विधानसभेला उभं करा" त्यावेळी शिरूर तालु्क्याने तालुक्यातला माणुस आमदार झालेला पाहिलं न्हवतं,तालुक्याबाहेरची माणसं आमदार होत होती.पण वैयक्तिक नातेसंबंधामुळे दादासाहेबांनी ती संधी नाकारली.नाहीतर आज तालुक्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे आपल्याला पहायला मिळाली असती.
               मला राजकारणाबद्दल आकर्षण यांच्या मुळच वाटु लागलं,मला माझे जोडीदार म्हणतात"हर्षा ,तुला राजकारणाचा लय नाद" मला त्यांना सांगुशी वाटतं ,"मला राजकारणाचा नाद आहे राजकारण्यांचा नाही" ही शिकवण मला दादासाहेबा़मुळेच मिळाली.राजकारणाच चिंतन व चर्चा नेहमी राजकीय प्रवाहांवर करावी ही मला त्यांनीच दिलेली देणगी.त्यांनीही आपल्या विचारांशी कधीही तजवीज करण्याचा प्रयत्न केला नाही ,पार पृथ्वी जरी पालथी झाली तरी आंबळे गावातुन दोन मते कॉंग्रेसला मिळाली असती ती म्हणजे दादासाहेब अन् त्यांच्या पत्नी !!
       मी कळित होईपर्यंत त्यांच बरंच वय झालं होतं,त्यामुळे मला त्यांचा फार काळ सहवास लाभला नाही.त्यांच्या देहावसनानंतरही ते मला मार्गदर्शन करत राहिले ,ते त्यांच्या कागदपत्रांच्या माध्यमातुन!! गेल्या वर्षी मोडीच्या गोडीमुळे सहज मी त्यांची पेटी उघडली तर मला त्यात कागदपत्र रूपी खजिना सापडला!त्यात इसवी सनाच्या  १८८६ व्या सालापासुन कागद सापडले ते त्यांच्या मृत्युपर्यंत ,अनेक दिवस विविध कारणांनी त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता आणि सर्वच लढायांत त्यांचा बिनदिक्कत विजय झाला होता. *कोल्हापुरच्या सरलष्कर निंबाळकरांचे जवळचे भाऊबंद* असा उल्लेख मला मोडी कागदपत्रांमधुन मिळाला.नाती संभाळावी ती त्यांनीच अगदी बहीणीबद्दलच असु अथवा धाकट्या भावा़बरोबर इतर कुणाशीही तुलना केली तर ते केव्हाही उजवेच ठरतील.
        दादासाहेबांसमोर आमच्या आजीने कधीच पायात पादत्राणे घातल्याचे मला तरी आठवत नाही ,आमच्या सर्वंं आजींच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती त्यामुळं त्यांचा घोषा अधिकच कडक व्हायचा. दादासाहेंबाच्या गोऱ्या साहेबांच्या राज्यातील शिकारीच्या कहाण्या माणसं आजही जीभेवर चवीने रेंगाळतात.हातात छत्री ,डोक्यावर फेटा ,पायात जोडे असा त्यांचा साधा वेष होता.पण त्याच हातात बंदुक आल्यावर तो भारदस्त वाटायचा.अशा करारी व्यक्तिंत्व असणाऱ्या दादासाहेंबाकडुन मी फार काही शिकलोय आजही शिकतोय त्यांच्या हुशारीच्या ,चातुर्याच्या अन् घरंदाजपणाच्या गोष्टी ऐकत !!

सर्वा़ना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

धन्यवाद

हर्षद रमेश हांडे देशमुख
कसबे कर्डे ता.शिरूर जि.पुणे

सैर मनालीची

मनाली......देवदार झाडांच्या गर्दीत बर्फाचा शालु नेसलेलं ,तिबेटच्या अगदी जवळच अन् समुद्रापासुन कितीतरी उंच असलेल एक छोटं टुमदार शहर.गेल्या फेब्रुवारीतील शेवटच्या आठवड्यात  निसर्गरम्य शहराला भेट देण्याचा सुवर्णकांचन योग आला तो आमच्या महाविद्यालयाच्या सहलीमुळे ,कसतरी चालढकल करत ,शिक्षकांच्या रेट्यामुळे आम्ही सहलीला जायला तयार झालो.सुरवातीला मी सहलीला जायला उत्साही न्हवतो पण कसाबसा झालो तयार  आणि एकदाची महाविद्यालयीन जीवनातली पहिली सहल निघाली.
 
आम्ही आमचा प्रवास पनवेलपासुन रेल्वेने सुरू केला तो थेट दिल्ली गाठे पर्यंत.आयुष्यात पहिल्यांदाच दिल्ली पाहिली अन् हायसं वाटल जिथुन देशाची सुत्र हालतात ते ठिकाण पाहण्यात काही वेगळाच अभिमान होता.दिल्लीत पोहचल्यावर आम्ही दिल्लीच वर वर दर्शन घेतलं अन् दुसऱ्या दिवशी नट्टापट्टा करून चंदीगडच्या दिशेने प्रवास सुरू केला.त्या दिवशी दिल्लीच तापमान ६° सेल्सिअस होतं.आम्ही आमची गरम कपडे परिधान करून बस मध्ये बसलो.दिल्ली-चंदीगड हायवेवरून जोरदार वेगाने मार्गक्रमण करत होतो,तेव्हढ्यात वाटेत देशाच्या राजकारणात तीनदा बदल घडवुन आणाणार पानिपत लागलं आणि इतिहासाची आठवण झाली.आजच्या समृद्ध हरियाणाला असा रक्तरंजित इतिहास असेल आज कुणालाही वाटणार नाही.सगळीकडे हिरवीगार शेती,मोठमोठी रेस्टॉरंट्सने संपुर्ण हायवे व्यापुन टाकला होता.चंदिगडला पोहचायला उशिर झाल्यामुळ रॉक गार्डनचा फेरफटका टाळुन आम्ही थेट पिंजोरा गार्डनला पोहोचलो,तिथुन गगनचुंबी पर्वत सहज दिसत होते आणि आम्ही बर्फाच्या जवळ आल्याचे जाणवु लागले होतं.२-३ तास मनमुराद भटकल्यामुळे आम्हाला निघायला उशिर झाला होता ,कसंबसं दिवस मावळायच्या वेळी आमची गाडी हालली 

आमच्या दोन बस होत्या.एक साऊंडवाली अन् दुसरी बिनासाऊंडची त्यावरून पोरापोरींच्यात भांडण होत होती.आमची गाडी हळुहळु घाट चढु लागली अन् आमचा शिमल्या दिशेने प्रवास सुरू झाला.रात्री ११ वाजता आम्ही शिमल्यात पोचलो. अन् हाड गोठणं म्हणजे काय ते जाणवलं ,शिमल्यात जणु थंडीची लाटच पसरली होती.आम्हाला झोपायला १ वाजले ,रूममध्ये गेलो तर अस वाटली गादीत बर्फ घालुन ठेवलाय ,जसं आपण बर्फाच्या पिशवीत ठेवतो तसा.पाणी प्यायच ते फक्त गरमच कारण गार पाणी तिथ न्हवतच होता तो फक्त बर्फच.एका रूममध्ये ३ पोरं, झोपायला पलंग एक त्यामुळ एकमेकांच्या ऊबीनं कसबस झोपलो म्हणायच तर रात्र काढली.सकाळी उठल्यावर सकयगळ्यांनी एकच केला ये रणछोडदास चांचड कहा रहते है?.आम्ही शिमल्यातुन २५ किमी दुर असलेल्या कुफ्रीच्या हिलस्टेशनकडे.तासाभरानंतर आम्हा कुफ्रीला पोचलो.तिथल्या लोकांशी चर्चा केली .अन सुमो गाडीने वर गेलो तिथुन परत खेचरांवरून निसरड्या वाटेने बर्फाळ पर्वताचा प्रवास फार गमतीशीर होता.कुफ्रीत नवीनच विवाहबंधनात अडकलेली मराठी नवदाम्पत्य मधुचंद्राच्या निमित्ताने आलेली पहायला मिळाली.तिथल्या स्थानिकांनी त्यांना जरा जास्तच लुटण्याचा डाव आखला होता.आमच्या 'जय महाराष्ट्र' अन् 'हर हर महादेवच्या' घोषणांनी
ते सहज आमच्याकडे आकर्षित होत होते व आमची आपुलकीने चौकशी करत होते.आमच्या बरोबर आमच्या वर्गमैत्रिणी थंडीमुळे अधिक गुलाबी पडल्या होत्या ,त्यांच रुपडं अधिकच देखण दिसु लागलं होत.त्यात अचानक तिथ हिमवर्षाव सुरू झाला अन् सर्वांची तारांबळ उडाली ,सगळी मंडळी पटापट गाडीकडे पळु लागली ,तासाभरात सगळी गोळा झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या शिमल्यातील लॉजवर जाऊन विसावलो .

आज माझ्या शरिरात मला ताप जाणवु लागला होता.मी एक गोळी खाऊन झोपण्याचा प्रयत्न केला.सकाळी लवकरच आवरून आम्ही मनालीच्या दिशेने कुच केली.शिमला ते मनाली अंतर होत फक्त २५० किलोमीटर ,सगळा रस्ता घाटाचा दोन पदरी तरी काहीतरी नॅशनल हायवेचा नंबर होता.तिथल्या घरांच्या रचना पाहून हसु यायचं अन पार्किंगची व्यवस्था पाहून कींव ,कशी काय लोक इथं राहतात हा प्रश्न पडायचा !! खळखळणारं पाणी ,कोसळलेल्या दरडी ,वेडेवाकडे रस्ते अन् एकमेकांची पापडयुक्त चेष्टा करत आमचं मार्गक्रमण सुरू होतं ,२५० किलोमीटरच फार थोड वाटणार अंतर आमच्या सहनशक्तीचा कस पाहत होतो.तब्बल बारा तासांचा प्रवास करून आम्ही मनालीत पोचलो.मनालीतल्या हॉटेल मध्ये अंगावर घ्यायला गादीसारखं कापड होतं सुरूवातीला मला ती गादीच वाटली त्यामुळ माझ थोडं हसुच झालं.पण दुसऱ्या दिवशी मनाली पाहणार असल्यामुळ सगळ विसरून गेलो. पाहतोतर काय आमच्या खोलीच्या बालकनीत देखील बर्फ होता.आम्ही सुमो गाडीत बसून बर्फाळ वाट काढत वशिष्ठ मुनींच्या मंदिरात,सप्तताऱ्यांपैकी एक ,कितीतरी घराण्यांचे गोत्र असलेले अन् रघुकुलभुषण प्रभु रामचंद्राचे गुरू असलेले वशिष्ठ मुनी तिकड का गेले कुणास ठाऊक पण भक्तांच्या अंघोळीची सोय मात्र केली ती गरम पाण्याच्या झऱ्याच्या माध्यमातुन.नंतर आम्ही मार्गस्थ झालो ते मनालीची राणी हिडिंबादेवीच्या मंदिराकडे ,बी.आर.चोपडा साहेबांच्या मालिकेत  पहिल्यांदा हिडिंबाच नाव ऐकल होत.मंदिराच्या चारही बाजुला याकची शिंग लटकवलेली होती.मंदिरात हिडिंबादेवीचा पायाचा मोठा ठसा होता.बाहेर आल्यानंतर घटोत्कचाचे मंदीर होते .त्याच दर्शन घेऊन मनालीच निसर्ग सौंदर्य न्याहाळत आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो.परत मागं फिरण्याचा दिवस आला होता.पण मन त्याला राजी होत न्हवत कसबस आम्ही मनावर ताबा ठेऊन परतीच्या प्रवासाला लागलो अन् चंदीगढवरून रेल्वेने घरी परतलो.३ वर्षात कुणात कधीही न मिसळणारा मी आज माझ्या वर्गमित्रमैत्रिणींचा होऊन गेलो होतो.

आणि ठरवल होतं परत पाच वर्षानी मी इथ येणार म्हणजे येणार!!!!

धन्यवाद
सोनबाराजे उपाख्य हर्षद रमेश हांडे देशमुख

मंदीर कब बनायेंगे?



मी जवळपास ४-५ वर्षे वयाचा होईपर्यंत आमचं कुटुंब आंबळे गावठाण हद्दीत राहत होतं.आजही  ते दिवस पटकण समोर येतात अन् ती माणसंही.त्यावेळेस गावातील बरचसं बांधकाम दगडी होतं.रांजणगावला औद्यौगिक वसाहत झाल्यामुळं गावात पैशाला यायला रस्ता सापडला होता.चासकमान डाव्या कालव्याच काम सुरू होतं,त्यामुळं शेतकरी उज्वल भविष्याच्या आशेवर होता.माझ्या आई-वडील दोघांचाही पेशा शिक्षकांचा असल्यामुळं त्या काळात आजी-आजोबांबरोबर जास्त वेळ घालवायला मिळाला.
                 अंघोळ करून गंध पावडर झाला की मी ,माझे  आजोबा दादाराव तस मी त्यांना बाबा म्हणतो (बाबा म्हणजे 'बा' चा 'बा' असा मी काढलेला अर्थ आहे)त्यांच्याबरोबर फिरायला जायचो.ते आपल्या भजनीमंडळाच्या बैठकीचं नेहमीचं ठिकाण असणाऱ्या राम मंदिरात त्यांच्या मित्र मंडळींबरोबर हितगुज करायचे.आजी मला राम मंदिरात गेल्यावर खायला म्हणुन डबा करुन द्यायची त्यात मिठाची गवार अन् चपाती असायची.बाबांच्या बोटाला धरून माझा गावचा  फेरपटका सुरू व्हायचा.पांडाभाऊंच्या पिठाच्या गिरणी जवळ आलो की पांडाभाऊ म्हणायचे"काय राजं,लावायची का पावडर लावायची?" मी त्यांच्या पीठाने भरलेल्या अवताराकडे पाहून घाबरायचो.त्याला प्रत्युत्तर म्हणुन बाबा म्हणायचे "सांग ना,घरूनच लाउन आलोय.मी मात्र घाबरून फक्त मानंच डोलवत असे.

 हळुहळू नाजुक पावलांनी लुटुलुटु करत राम मंदिर गाठायचो.राम मंदीर म्हणजे खरखुरं रामलक्ष्मणाच्या मुर्त्या असलेलं मंदिर न्हवत,त्याची नियोजित जागा होती.अन् त्याजागेवर दोन खोल्या होत्या त्यातल्या एका खोलीला राम मंदिर म्हणायचे.खोलीच्या आतमध्ये विविध देवदेवतांची छायचित्रे लावलेली असायची त्यातल रामाचं अन् अर्धनारीनटेश्वराचं चित्र अजुनही मला स्पष्ट आठवतय कारण त्या अर्धनारीनटेश्वराच्या अवताराकडं बघुन कुतुहुल व्हायचं म्हणजे भीतीच.पायऱ्या चढता यायच्या नाहीत म्हणुन बाबा मला उचलुन ओट्यावर ठेवायचे.ओट्यावर चिमुकाटा असायचा ,चिमुकाटा टोचणार नाही अशा पद्धतीने मी चप्पल काढुन आत डोकवायचो आणि हसायचो.कारण दारात बसलेले असायचे आमचे पणजोबा कोंडीरामराजे यांचे मित्र माधवराव केशवराव घायतडक.ते माझ्याकडं म्हणुन म्हणायचे "आलं बघा कोंडीरामराजं ,आज आणला का डबा" ,मी म्हणायचो " हा,आणला ना"आत गेल्यावर सर्वांचा राम राम सुरू व्हायचा.राम मंदिरात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आमच्या बाबांवर जीवापाड प्रेम केलं त्यात जयवंतराव अण्णा ,साहेबराव आबा यांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल.तिथं बसणारी बरीच माणसं आठवतात बाबाजी घुंबरे,बाबाजी डाळिंबकर ,दत्तोबा पाटील,जयवंत अण्णा ,साहेबराव आबा हे तीन बंधु,गोलेकर अण्णा,माधवराव घायतडक,दगडु मिस्त्री,तुकाराम तात्या ही माणसं मला ठळक आठवतात.
   
थोडी हितगुज झाल्यानंतर त्यांची गाडी चहाकडे वळायची त्या खोलीत एक रॉकेलवरचा स्टोव्ह देखील होता त्यावर चहा करायचा अन् स्टीलच्या पितळीतुन प्यायचा असा नित्यक्रम एक १०-१२ पितळ्या असतील तिथं.मला मात्र डबा खायला लावायचे मी डबा खात नसं तेव्हा जयवंत अण्णा माझ्या शेजारी बसून स्वत:च्या हाताने मला घास भरवत असायचे मग माझी पाळी आली की मी त्यांना घास भरवायचो.मला चहा दिला नाही की मी मात्र भोंगा पसरवायचो.😅कशीबशी समजुत काढायचे.जसं ऊन चढु लागंल तसतस प्रत्येक जण आपापल्या वाटंनी घराकडे निघत असत.मी वर उल्लेखल्या व्यक्तीपैंकी आज फक्त १-२ व्यक्तीच आज हयात आहेत.त्यांच्यातलं एक एक पान गळु लागलं तशी राम मंदिरातली गर्दी कमी झाली आणि आज त्या खोलीला १२ महिने २४ तास कुलुप असतं .राम मंदिरात बसणाऱ्यांची तीव्र इच्छा होती की गावात एक राम मंदिर व्हाव!! मात्र ते आजतागायत झालं नाही.
त्यानंतरचा एक दिवस मला आठवतोय कदाचित मी ६ वीला असेल बबन गायकवाड(कोळी) पत्रिका वाटत असताना आमच्या घरी आले त्यावेळी दादासाहेब निंबाळकर  पेपर वाचत बसले होते.दादासाहेंबांच गावात जाणं कमी झालं होत  त्यावेळी दादासाहेंबा़नी उच्चारलेलं वाक्य आठवतय "क्यौं बबनराव,राम मंदिर कब बनाये़गे"

समाप्त 

सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

मराठी शाळेतल्या पोरांचा सुद्धा नंबर येतो



काल महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस होता.त्यामुळं समाज माध्यम दादांच्या छायाचित्रांनी तुडुंब भरलेली आपल्याला दिसली असतील.अजितदादा आपल्या रोखठोक भुमिकेमुळं जनसामान्यांच्यात प्रसिद्ध आहेत.त्यांच्या प्रशासनातील हातखंड्याची विरोधकही कौतुक करतात.८-९ वर्षापुर्वी अजितदादा एकट्याच्या जीवावर १०० आमदार निवडुन आणतात की काय अशी चर्चा होती.तेव्हा स्मार्टफोन एव्हढ्या सहजासहजी उपलब्ध होत न्हवते त्यामुळं समाज माध्यमा़च जाळं आखुडच पडत होतं,त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांच कार्यक्रम घेण्यावर अधिक भर असायचा .असाच एक कार्यक्रम 'पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसने' घेतला होता,त्याच नाव होतं 'अजित वक्तृत्व अभियान'.ते वर्ष होत इ.स.२०१० त्या वर्षी मी नुकताच ७वीत गेलो होतो.पुणे जिल्ह्यातल्या १३ ग्रामीण तालुक्यात ती स्पर्धा आयोजित केली गेली होती.त्याच नेतृत्व केलं होत महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा वैशालीताई नागवडे यांनी आणि शिरूर तालुक्याची जबाबदारी पेलली होती शिरूर तालुका अध्यक्षा वर्षाताई शिवले यांनी.स्पर्धेची सुचना तालुक्यातील प्रत्येक शाळेला पाठवली होती.त्यात आमच्या शाळेचाही समावेश होता.

आमची शाळा म्हणजे 'जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा आंबळे'.आमच्या शाळेची स्थापना होती ५ जुन १९०५ ;तालुक्यातल्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक,त्यामुळ फार फार लांब लांबच्या गावांचा आमच्या शाळेशी संबंध होता,अनेक जण आमच्या शाळेतुन मोठे झाले होते.आमच्या शाळेत अजित वक्तृत्व अभियानची सुचना प्राप्त झाल्यानंतर, नेहमी प्रमाणे सरांनी म्हणजे भरत गुरूजींनी माझ्या नावाचा विचार केला आणि मला तयारी करायला सांगितली.मी घरी आल्यानंतर स्पर्धेच्या विषयांचा विचार केला, त्यात एक होता अष्टपैलु नेतृत्व' चटकन अजित पवारांच नाव समोर आलं.दै.लोकमतच्या वाढदिवस विशेष सदरात वैशालीताई नागवडेंनी अजितदादांवर लेख लिहिला होता,तो मी तंतोतंत पाठ केला.माझ्या मम्मीनी मला हावभाव व हातवारे करायला शिकवलं.वैशालीताईंनी लिहिलेला लेख मला तोंडपाठ होता.

    बघता बघता स्पर्धेचा दिवस उजाडला होता.मी रोजच्या प्रमाणे पप्पांच्या गाडीवर बसून शाळेत गेलो.शाळेत गेल्यावर भरत गुरुजींनी पुन्हा माझी तयारी घेतली व माझे वर्गशिक्षक वेताळ सरांसोबत मला स्पर्धेच्या ठिकाणी  घोडनदीला रवाना केलं.स्पर्धेच ठिकाण होत 'शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर'.मुख्य इमारतीच्या ३ऱ्या मजल्यावर संस्थेच सभागृह आहे ,त्या सभागृहात हा कार्यक्रम होता.आम्ही तिथ पोचायच्या आधीच सभागृह गच्च भरलेलं होत.सशाच्या काळजानी मी चाचपडत चाचपडत सभागृहात प्रवेश केला.सभागृहात बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पद भुषवलेल्या व्यक्तींच्या तसबिरी लावल्या होत्या.त्यात सहकारमहर्षी रावसाहेब दादा पवार व रामकृष्णआबा ढमढेरे हे आमच्या नातेसंबंधातले असल्यामुळं ते माझ्या लक्षात राहिले.स्पर्धेला सुरूवात झाली.ज्ञानेश पवार हे प्राथमिक शिक्षक त्या स्पर्धेचे सुत्रसंचालन करत होते.व्यासपीठावर वैशालीताई व वर्षाताईंसह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी होत्या.स्पर्धेत प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयावर आपापली वक्तृत्व सादर करत होता.दुपारनंतर माझा नंबर आला.घाईगरबडीत कसं का होईना मी माझं भाषण संपवलं.माझ्या भाषनानंतर स्पर्धक कमी राहिले होते ,तरीही संध्याकाळ होत आली होती.निकालाची वेळ जवळ येत चालली होती,माझ्या मनात धाकधुक सुरू होती.अजिदादांवर दुसरं कुणी भाषण केलं न्हवतं त्यामुळ माझा नंबर येण्याची संधी होती.अन् झालंही तसच माझा चौथा नंबर आला होता.मी बक्षिस घेण्यासाठी व्यासपीठावर गेलो तसा ज्ञानेश पवार सरांनी उल्लेख केला"पहा जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा नंबर येतो".मला त्या वाक्याचा अर्थ उमगला नाही.

 मी घरी आल्यावर घरच्यांनी देखील माझं कौतुक केलं पण मला न कळलेल्या वाक्याचा अर्थ सांगितला नाही.पण जसं वय वाढल़ं मी विद्याधामला गेलो तेव्हा कळलं की आपला समाज हा सरकारी शाळांना तुच्छ लेखणारा आहे.त्यामुळं मनात कुठतरी न्युनगंड बळावु लागला होता,पण सातवीत असताना माझी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी केलेली तयारी वाया गेली नाही.गणितात मी विद्याधामच्या पोरांच्याही पुढे होतो.९वीत असताना मला पडणाऱ्या पैकीच्या पैकी मार्कांमुळ  शाळेत मला सगळी पोरं ओळखु लागली होती.तसा तसा माझा माझ्या जिल्हा परिषद शाळेचा अभिमान वाटु लागला होता.अन् तो अजुनही वाढतोय.पण  आजही समाजाचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा अंदाच दुखावणारा आहे आणि लोकांची इंग्रजी माध्यमांकडे असणारा कल पाहिला की कींव येते.आणि लक्षात येतं की आजचा समाज ग्लॅमरस जीवनाच्या नादात अधोगतीकडे वाटचाल करतोय.आपल्या जिल्हा परिषद शाळा अजुन कशा प्रगत होतील याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे.

धन्यवाद

----सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडेदेशमुख.
(माजी मुख्यमंत्री,शालेय मंत्रीमंडळ जिल्हा परिषद शाळा आंबळे)

फडणवीस_सरकार:अंगद का पैर


देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.महाराष्ट्राचे गेल्या ४४ वर्षातील सर्वांत वेगळे मुख्यम़त्री हो !!सर्वात वेगळे त्याला कारणही तसच आहे १९७५ साली वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले नि २०१४ पर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने आपल्या कारकिर्दीची सलग ५ वर्ष पुर्ण केली नाहीत.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली नि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आपल्या योग्य निर्णयांमुळे ते महाराष्ट्राचे शिल्पकार आणि भाग्यविधाते ठरले.त्यानंतर एक वर्ष पी.के.सावंतांच्या कार्यकाळानंतर वसंतराव नाईकांचा १३ वर्षाच्या काळ महाराष्ट्राच्या शेतीकारणासाठी सुवर्णकाळ ठरला.प्रत्येक गावात एक 'दादा पाटील' असतो त्याप्रमाणे वसंतदादा महाराष्ट्राचे दादा पाटील झाले पण १९७८ साली शरद पवारांच्या 'पुलोद' प्रयोगामुळे कॉंग्रेसच्या पडझडीला सुरूवात झाली,देशात ती १९६७ सालीच सुरू झाली अन् शरद पवार साहेब महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री झाले.ते आजतायगायत महाराष्ट्राचं राजकारण त्यांच नाव घेतल्याशिवाय पुर्ण होत नाही.त्यांच्यानंतर १९८० साली त्यांच सरकार बरखास्त झालं अन्१९९५ पर्यंत २-३ वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री होत राहिले.१९९५ ला पहिल्यांदा कॉंग्रेसविरहित शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं आणि ते पाच वर्ष टिकलं पण मुख्यमंत्री काही पाच वर्ष टिकले नाहीत .या नाहीतर त्या प्रकारे मुख्यमंत्री बदलत राहिले.पण २०१४ साली कॉंग्रेस सरकारच्या कारभारावर झालेली निराशा भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडली नि भारतीय जनता पक्ष राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदारांसह सरकारची स्थापना झाली.वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन देवेंद्रजी राज्याचे दुसरे तरूण मुख्यमंत्री ठरले विशेष म्हणजे त्यांना वसंतराव नाईक,पवारसाहेब,वसंतदादा यांसारखं लोकमत न्हवतं.देवेंद्र फडणवीसांचा जन्म विदर्भातील एका मातब्बर मालगुजार कुटुंबात झाला.त्यांचे वडील जनसंघाचे प्रचारक होते.त्यांचाच वारसा चालवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीला सोबत घेऊन देवेंद्रजींनी राजकारणात प्रवेश केला.१९९२ ला सुरू झालेला प्रवास नगरसेवक,महापौर,आमदार,प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री असा अनाकलनीय ठरला.२०१४ साली सरकार स्थापन झाल्यानंतर 'हे सरकार टीकणार नाही'अशा वावड्या उठवल्या.दस्तुरखुद्द शरद पवार साहेबही त्यात सामिल होते.पण घडलं वेगळंच ,६ महिन्यांनी पहिले विरोधी पक्षनेतेच फडणवीस सरकार मध्ये मंत्री झाले.हा देवेंद्र फडणवीसांचा पहिला यशस्वी डाव पडला.छगन भुजबळांवर कारवाई करून त्यांनी विरोधकांवर चाप बसवला.फडणवीसांची पाच वर्षे सर्वात धांदलीची पाच वर्षे ठरली.संप,मोर्चे,दंगलींनी फडणवीस साहेबांची कसोटी पाहिली.महाराष्ट्रात देश स्वतंत्र झाल्यापासुन पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा संप केला त्याला त्यांनी हाताळलेल्या सचोटीनं शेतकऱ्यांना खुष केलं.भीमा कोरेगाव दंगलीदरम्यान जनतेने त्यांची निर्णयक्षमता तपासली,राज्याला त्यांच्यातल्या उत्तम प्रशासक असल्याची चुणुक दाखवली.त्यांच्या कार्यकुशलतेपुढे विरोधकांच्या 'हल्लाबोल'सारख्या यात्रा फोल ठरल्या.फडणवीसांच्या काळात कधीही न घडलेला मराठा क्रांती मोर्चा घडला,सारा महाराष्ट्र एका छताखाली एकत्र झाला होता पण तरीही फडणवीसांनी मराठ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लाऊन मराठ्यांना १६% आरक्षण दिलं व विविध योजना मार्गी लावल्या.फडणवीसांना कात्रीत पकडणारे लोकांवरच उलटे डाव पडले.मुख्यमंत्री बदलण्याचे भाषा बोलणाऱ्या लोकांची बोलती बंद झाली.मुख्यमंत्री नाही बदलले पण विरोधी पक्षनेते तिनदा बदलले हे महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल.लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भरगोस यश मिळालं.मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा सुरू केल्यानंतर केंद्रसरकारनं  रद्द केलेलं राज्यघटनेतील ३७७ वे कलम हे निवडणुकीत त्यांच्या पथ्यावर पडणार आहे येत्या २ महिन्यात ते धनगर आरक्षणाचा मुद्दामार्गी लावण्याची चिन्हे आहेत.अशा प्रकारे त्यांच सरकार 'अंगद का पैर'ठरलय.त्यामुळं त्यांनी म्हणल्याप्रमाणे ते खरच परत येतील!!!

#हर्षवाणी

#महाजनादेश
#bjpformaharashtra

--सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

कुठं गेले बापुराया



बाप करी जोडी।लेकरांची ओढी।
आपुली करवंटी वाळवुनी।।

आमचे आजोबा राजश्री यधोराव उपाख्य बापुराय कोंडीराम हांडे देशमुख सरकार जुन्नर परगणे कर्डे निमोणे, करडे परगण्यातील ८४ गावचे मुख्य वतनदार कोंडीरामराजे यांचे थोरले अपत्य.त्यांचा जन्म १९३६ सालचा  आमच्या आजोबांच खरं नाव यधोराव त्यांच्या चुलत्यांच्या नावावरून ठेवलेलं पण 'कोंडीरामराजांच लेकरू' म्हणुन लोक त्यांना लाडाने 'बापुराया' म्हणत असत.आमच्या आजोबांच लहानपण त्यांच्या आजोळात गेलं म्हणजे भांबर्ड्यात,भांबर्डे गावचे कारभारी सखारामबापु पवार पाटील हे आमच्या आजोबांचे मामा ते पुढे भांबर्डे गावचे आजीवन  ३५ वर्षे सरपंच राहिले.पाटलाचा भाचा म्हणुन म्हणुन लाडाने त्यांना बबड्या म्हणतात नि बबड्याचा पुढे झाला बबनराव अन् समस्त भांबर्डेकरांचे ते झाले  बबनदाजी.इंग्रज सरकारच्या राज्यात मिळणारा देशमुखी पेन्शन १९५२ साली बंद झाली अन् त्याच वर्षी आमच्या परिसरात मोठा दुष्काळ पडला आमच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी सिंहगड पायथ्याशी  स्थलांतर कराव लागलं,नि कशीबशी पोटापाण्याची सोय झाली.दुष्काळाच्या काळात २-३ वर्षे तिथच काढावी लागली. पुन्हा करड्याला आले तरी परिस्थिती बेताचीच होती. कसेबसे शेती करत दिवस काढत होते नंतर सर्वांच्या संमतीने १९५८ च्या आसपासनपुण्याला गेले पण १९६२ साली पानशेत धरण फुटलं नि आमचे आजोबा पुरग्रस्त झाले होत तेव्हढं ते सगळं मुठाआईने तिच्या पदरात घेतलं पुन्हा पहिल्यासारखीच परिस्थिती आली.१९६७  साली पुन्हा पोटापाण्यासाठी स्थलांतर कराव  लागलं पण यावेळी ठिकाण होतं माळेगाव (शरद पवारांच).शरद पवारांची  पहिली निवडणुक कशी होती ते अगदी रंगवुन सांगत.पुन्हा गावाकडे आले.करड्यावरून आंबळ्याला शेतात  काम करायला येणं अवघड होऊ लागलं होतं.त्यामुळं ते आंबळ्यात कायमस्वरूपी वास्तव्यास आले.तिथ त्यांना गोलेकर अण्णा नि विलास दादा ही जिवाला जीव देणारी माणसं भेटली.गोलेकर अण्णांनी विचारलं "तुम्हाला घरात कोणत्या नावाने हाक मारतात" ते म्हणाले "मला सगळे दादा म्हणतात" अण्णांनी उत्तर दिलं "मग आजपासुन तुम्ही दादाराव" दादाराव म्हणलं की आडनाव सांगायची गरज न्हवती.आमचे वडील,चुलते जसजसे मोठे होऊ लागले तसं पैशांची चणचण अधिकच भासु लागली तरी आमच्या आजोबांनी धीर सोडला नाही. दहावीत चांगली मार्कं पडल्यामुळं आमच्या वडीलांचा १९९३ साली डीएड् ला नंबर लागला नि आजोबांनी सुटकेचा निश्वास सोडला तरी वाट सोपी न्हवती बाहेरगावी राहणंसुद्धा खिशाला परवडणारं न्हवतं पण आमच्या आजोबांचे साडु गाडेकर सर (पुढे ते रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे इन्सपेक्टर झाले) त्यांनी आमच्या वडीलांचा शैक्षणिक खर्च उचलला नि तिथुन पुढं आमची गाडी रूळावर आली.
आमच्या आजोबांच पोट हातावर असताना सुद्धा त्यांनी आपली देशमुखी संभाळणाऱ्या  तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही.मला म्हणायचे "भावड्या,शिळी भाकरी शिळं कालवण खा पण कधी कुणाबरोबर लबाडी करु नकोस, देव तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही." त्यामुळं त्यांच्या या शिकवणीमुळं मी केवळ दादारावचा नातुच नाही तर दादारावचा पठ्ठ्या सुद्धा झालो.माझे विचार जुन्या माणसांसारखं असण्याचं हेच कारण आहे.मला ते सांगायचे "भाऊ,आपण ९६ कुळी " मी म्हणायचो "९६ कुळी म्हणजे काय?" ते  म्हणायचे "पिव्वर मराठा" मी म्हणायचो "पिव्वर मराठा म्हणजे काय" माझ्या अजाणतेपणाला पाहुन ते हताश व्हायचे.आंबळे गावातवारकरी संप्रदायाची स्थापना करण्यात ते संस्थापक सदस्य होते.
आमचे वडील नोकरीला लागल्यापासुन सर्व काही आलबेल होतं पण गेल्या वर्षी मुत्रपिंडानी त्यांच्या शरिराची साथ सोडली अन् अंथरूणाला खिळले. 'तुका म्हणे मायबाप केवळ काशी तेणे न जावे तिर्थासी' या उक्ती प्रमाणे आमच्या वडिलांनी तन,मन,धनानी आजोबांची सेवा केली पण परमेश्वराचा सांगावा कुणी टाळु शकत नाही गेल्या १७ तारखेला त्या़ची प्राणज्योत मावळली.आमची आजी नवीन असताना करड्यातली माणसं "कुठं गेलं बापुराया" असं म्हणुन आमच्या आजीला चिडवत असत.आज ते त्यांची ४५ वर्षाची वारकरी संप्रदायाची सेवा केली म्हणुन नक्कीच वैकुंठात गेले असतील.
त्यांच्या अंतयात्रेला आणि दशक्रिया विधीला लोटलेली अफाट जनसागर हे त्यांच्या आयुष्याचं संचित आहे.

#दादारावचानातु

🖋 सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
Harshad Deshmukh

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...